आदिवासी विद्यार्थ्यांचा जनआक्रोश; विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक ;१२ हजार ५०० पदांची विशेष भरती, वसतिगृहांची क्षमता वाढविण्यासह ‘स्वयं’ योजनेची रक्कम वेळेत देण्याची मागणी

विविध शैक्षणिक मागण्यांसाठी जळगावात आदिवासी विद्यार्थ्यांचा जनआक्रोश मोर्चा; १२ हजार ५०० पदांची विशेष भरती आणि वसतिगृहांच्या मागणीसाठी जोरदार आंदोलन.

जळगावात आदिवासी विद्यार्थ्यांचा आक्रोश मोर्चा; विशेष पदभरती, नवीन वसतिगृहे, आर्थिक मदत आणि शैक्षणिक समस्यांच्या तातडीने निराकरणाची मागणी.

 विविध शैक्षणिक समस्या आणि प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जळगाव शहरात आदिवासी विद्यार्थ्यांनी ‘आदिवासी विद्यार्थी जनआक्रोश मोर्चा’ काढत प्रशासनाचे लक्ष वेधले. जी.एस. ग्राउंड (शिवतीर्थ मैदान) येथून सुरू झालेला हा मोर्चा शहरातील प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करत जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला.

या मोर्चात शेकडो आदिवासी विद्यार्थी आणि विद्यार्थिनी सहभागी झाले होते. हातात विविध मागण्यांचे फलक, बॅनर तसेच महापुरुषांची छायाचित्रे घेऊन विद्यार्थ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. ‘जय जोहार, जय आदिवासी’ आणि ‘आमचा हक्क, आमचा अधिकार’ अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.

१२ हजार ५०० पदांची विशेष भरती करण्याची मागणी

आदिवासी समाजातील बेरोजगार युवक-युवतींसाठी १२ हजार ५०० पदांची विशेष पदभरती तातडीने राबवावी, अशी प्रमुख मागणी विद्यार्थ्यांनी केली. तसेच आदिवासी मुला-मुलींसाठी नवीन वसतिगृहांच्या इमारती मंजूर करून त्यांची प्रवेश क्षमता वाढवावी, अशी मागणीही करण्यात आली.

आश्रमशाळांमध्ये सर्पदंशामुळे मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना तातडीने आर्थिक मदत व योग्य भरपाई जाहीर करावी, अशी मागणीही मोर्चाच्या माध्यमातून प्रशासनाकडे करण्यात आली.

‘स्वयं’ योजनेची आर्थिक मदत वेळेत देण्याची मागणी

पंडित दीनदयाल उपाध्याय ‘स्वयं’ योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना मिळणारी आर्थिक मदत वाढवून ती थेट डीबीटीच्या माध्यमातून वेळेत विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा करावी, अशी मागणी करण्यात आली.

यासोबतच आदिवासी विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या विविध शैक्षणिक अडचणींचे तातडीने निराकरण करावे, अशी मागणीही विद्यार्थ्यांनी केली.

आदिवासी विकास विभागाच्या धोरणांविरोधात नाराजी

मोर्चादरम्यान विद्यार्थ्यांनी आदिवासी विकास विभागाच्या विविध धोरणांविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. शिक्षण, वसतिगृह, आर्थिक मदत, रोजगार आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेशी संबंधित प्रश्नांकडे शासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी भूमिका आंदोलक विद्यार्थ्यांनी मांडली.

मोर्चानंतर विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन प्रशासनाकडे सादर करण्यात आले. मागण्या तातडीने मान्य करून त्यांची प्रभावी अंमलबजावणी न झाल्यास आगामी काळात आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा आदिवासी विद्यार्थी जनआक्रोश मोर्चाच्या माध्यमातून देण्यात आला.

या आंदोलनामुळे आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व रोजगारविषयक प्रश्नांचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, प्रशासन आणि शासन या मागण्यांवर काय निर्णय घेते, याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!