महिलांसाठी आधारवड ठरतंय जळगाव पोलिसांचं “भरोसा सेल”; चार महिन्यांत 1053 प्रकरणांची नोंद

महिलांवरील अत्याचार, कौटुंबिक वाद आणि मानसिक तणावावर उपाय देण्यासाठी जळगाव पोलिसांचा “भरोसा सेल” प्रभावीपणे कार्यरत असून चार महिन्यांत 1053 प्रकरणांची नोंद झाली आहे.

समुपदेशन, कायदेशीर मदत, पोलिस संरक्षण आणि मानसशास्त्रीय सेवा देणाऱ्या जळगाव पोलिसांच्या “भरोसा सेल”ची कामगिरी चर्चेत; चार महिन्यांत 1053 प्रकरणांची नोंद.

महिलांवरील वाढते अत्याचार, कौटुंबिक वाद, मानसिक ताणतणाव, फसवणूक आणि सामाजिक समस्यांच्या पार्श्वभूमीवर जळगाव पोलिसांनी सुरू केलेले “भरोसा सेल” हे महिलांसाठी विश्वास, आधार आणि सुरक्षिततेचे महत्त्वपूर्ण केंद्र ठरत आहे. विविध समस्यांनी ग्रासलेल्या महिलांना एकाच छताखाली समुपदेशन, कायदेशीर मदत, पोलिस संरक्षण, वैद्यकीय मदत, मानसशास्त्रीय सेवा आणि तात्पुरता निवारा उपलब्ध करून देण्याचे काम या सेलमार्फत प्रभावीपणे केले जात आहे.

जळगाव पोलिसांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या माहितीनुसार, आधुनिक जीवनशैलीमुळे वाढलेले शहरीकरण, अणुकुटुंब पद्धती, नातेसंबंधातील तणाव, दीर्घ कामाचे तास आणि डिजिटल माध्यमांचा वाढता वापर यामुळे अनेक कुटुंबांमध्ये मतभेद आणि मानसिक समस्या निर्माण होत आहेत. अशा परिस्थितीत “भरोसा सेल” महिलांसाठी आधारस्तंभ बनत असल्याचे दिसून येत आहे.

महिलांसाठी सर्व सेवा एकाच छताखाली

भरोसा सेलमध्ये महिलांना खालील सेवा उपलब्ध करून दिल्या जात आहेत :

  • समुपदेशन सेवा
  • कायदेशीर मदत
  • पोलिस संरक्षण
  • वैद्यकीय मदत
  • मानसशास्त्रीय सेवा
  • तात्पुरता निवारा

या सेवांमुळे कौटुंबिक हिंसाचार, छळ, पती-पत्नी वाद, मानसिक त्रास किंवा सामाजिक दबावामुळे त्रस्त महिलांना त्वरित मदत मिळत आहे. अनेक प्रकरणांमध्ये समुपदेशनाद्वारे तुटलेली नाती पुन्हा जुळवण्यात यश मिळत असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

चार महिन्यांत हजाराहून अधिक प्रकरणे

सन 2026 मध्ये जानेवारी ते एप्रिल या कालावधीत भरोसा सेलकडे एकूण 1053 प्रकरणांची नोंद झाली आहे. त्यापैकी :

  • 408 प्रकरणांमध्ये समजुतीने तोडगा काढण्यात आला
  • 183 प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले
  • 462 प्रकरणे सध्या प्रलंबित आहेत

विशेष म्हणजे, समजुतीने मिटविण्यात आलेल्या प्रकरणांमुळे अनेक नवरा-बायकोचे संसार तुटण्यापासून वाचल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.

“सदरेचे काम सहसा चर्चेत येत नाही”

भरोसा सेलच्या कामाबाबत पोलिसांनी एक महत्त्वाची बाब अधोरेखित केली आहे. “सदरेचे काम सहसा कोणाच्या नोटीसमध्ये येत नाही आणि त्यांची कामाची दाददेखील आपण देत नाही,” असे नमूद करत समाजाने अशा उपक्रमांकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे.

महिलांमध्ये वाढतोय विश्वास

महिलांच्या सुरक्षिततेसाठी आणि समस्यांवर तातडीने उपाय मिळवून देण्यासाठी जळगाव पोलिसांचा हा उपक्रम प्रभावी ठरत असून, महिलांमध्ये पोलिसांविषयीचा विश्वास वाढताना दिसत आहे. विशेषतः मानसिक आधार, समुपदेशन आणि कायदेशीर मार्गदर्शन या सेवांचा महिलांना मोठा फायदा होत आहे.

जळगाव पोलिसांनी “भरोसा तुमचा… जबाबदारी आमची” हा संदेश देत प्रत्येक समस्याग्रस्त महिलेला मदतीसाठी पुढे येण्याचे आवाहन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!