वाठार पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी; ६.१५ लाखांचे २५ हरवलेले मोबाईल शोधून नागरिकांना परत

वाठार पोलीस ठाण्याने सायबर पोलिसांच्या मदतीने ६ लाख १५ हजार रुपये किमतीचे २५ हरवलेले मोबाईल शोधून काढत संबंधित नागरिकांना परत देण्याची कार्यवाही केली. वाठार पोलिसांच्या या उल्लेखनीय कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

वाठार पोलीस ठाण्याची उल्लेखनीय कामगिरी; महाराष्ट्रासह इतर राज्यांतून शोधून ६.१५ लाखांचे २५ मोबाईल हस्तगत. नागरिकांकडून पोलिसांचे कौतुक.

वाठार पोलीस ठाण्याने नागरिकांचे हरवलेले मोबाईल शोधून काढण्याच्या विशेष मोहिमेत उल्लेखनीय यश मिळवले असून तब्बल ६ लाख १५ हजार रुपये किंमतीचे २५ मोबाईल फोन हस्तगत करण्यात आले आहेत. या मोबाईलची संबंधित मालकांना परत देण्याची प्रक्रिया देखील सुरू करण्यात आली असून वाठार पोलिसांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर तसेच सातारा ग्रामीण विभागाच्या उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री तेरणी यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली. वाठार पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशील भोसले यांनी नागरिकांचे गहाळ झालेले मोबाईल शोधून काढण्यासाठी गुन्हे प्रकटीकरण (डी.बी.) पथकाला विशेष सूचना दिल्या होत्या.

त्यानुसार डी.बी. पथक आणि सायबर पोलीस ठाणे, सातारा यांच्या संयुक्त प्रयत्नातून तांत्रिक माहितीचा वापर करून महाराष्ट्रासह इतर राज्यांमधील मोबाईल धारकांशी सातत्याने संपर्क साधण्यात आला. मोबाईल हस्तांतरित झालेल्या विविध व्यक्तींपर्यंत पोहोचून त्यांचा मागोवा घेण्यात आला. पोलिसांनी चिकाटीने केलेल्या पाठपुराव्यामुळे वाठार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागरिकांचे हरवलेले २५ मोबाईल शोधण्यात यश आले.

हस्तगत करण्यात आलेल्या मोबाईल फोनची एकूण किंमत सुमारे ६ लाख १५ हजार रुपये असून संबंधित नागरिकांना त्यांचे मोबाईल परत देण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात आली आहे. हरवलेले मोबाईल शोधून देण्याची ही मोहीम भविष्यातही सातत्याने राबविण्यात येणार असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशील भोसले यांनी दिली.

या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशील भोसले यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे प्रकटीकरण (डी.बी.) पथकाचे पोलीस उपनिरीक्षक गहिणीनाथ सातव, पोलीस उपनिरीक्षक नितीन भोसले, पोलीस हवालदार तानाजी चव्हाण, उदय जाधव, जितेंद्र शिंदे, प्रकाश चव्हाण, पोलीस कॉन्स्टेबल विठ्ठल काळे, प्रथमेश अलगुडे, प्रशांत गोरे, प्रतीक देशमुख, आशा देशमुख तसेच सायबर पोलीस ठाणे, सातारा यांच्या अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

नागरिकांचे हरवलेले मोबाईल परत मिळवून देण्यात आलेल्या या यशस्वी मोहिमेमुळे वाठार पोलिसांबद्दलचा जनविश्वास अधिक दृढ झाला असून पोलिसांच्या तत्पर आणि लोकाभिमुख कार्यपद्धतीचे हे उत्तम उदाहरण मानले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!