मुक्ताईनगर तालुक्यातील हरताळा शिवारातील वन विभागाचा रस्ता खुला करण्यासाठी निवेदन सादर. निर्णय न झाल्यास स्वातंत्र्यदिनी आमरण उपोषणाचा इशारा.
मुक्ताईनगर तालुक्यातील हरताळा शिवारातील गट क्रमांक ६७५ मधील वन विभागाचा अनेक वर्षांपासून बंद असलेला रस्ता तातडीने खुला करण्यात यावा, या मागणीसाठी माजी विशेष कार्यकारी अधिकारी व मुक्ताईनगर विशेष संघटनेचे माजी अध्यक्ष अतुल अरुण जावरे यांनी प्रशासनाकडे निवेदन सादर केले आहे. संबंधित मागणीवर अद्याप कोणताही ठोस निर्णय न झाल्यास १५ ऑगस्ट २०२६ रोजी तहसील कार्यालय, मुक्ताईनगर येथे आमरण उपोषण करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
हरताळा ते चक्रधर स्वामी मंदिर या मार्गावरील वन विभागाचा रस्ता काही वर्षांपूर्वी सर्वसामान्य नागरिकांसाठी खुला होता. मात्र नंतर हा मार्ग बंद करण्यात आल्याने नागरिक, वारकरी, भाविक तसेच शेतकऱ्यांना मोठा वळसा घालून प्रवास करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
निवेदनानुसार, हरताळा तलाव परिसरात वन विभागाने सुमारे ४ ते ५ कोटी रुपये खर्च करून बाल उद्यान व नागरिकांसाठी पार्क विकसित केले आहे. मात्र त्या ठिकाणी जाण्यासाठीचा मुख्य रस्ता बंद असल्याने या सुविधांचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः चक्रधर स्वामी मंदिरात येणारे भाविक, वारकरी, श्रीकृष्ण भक्त आणि परिसरातील शेतकरी यांना मोठा फेरा मारून जावे लागत असल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
या प्रश्नाबाबत यापूर्वीही प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले असल्याचे अतुल जावरे यांनी सांगितले. त्यांनी २७ जानेवारी २०२६ व १३ जुलै २०२६ रोजी तहसील कार्यालय आणि वन विभागाकडे लेखी पत्रव्यवहार केला होता. त्यानंतर तहसीलदारांनी १४ जुलै २०२६ रोजी वन विभागाला आवश्यक कार्यवाही करण्याबाबत पत्र पाठविल्याचेही निवेदनात नमूद आहे. मात्र अद्याप रस्ता खुला करण्याबाबत कोणताही अंतिम निर्णय झालेला नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.
यासंदर्भात हरताळा ग्रामपंचायत, निमखेडी खुर्द ग्रामपंचायत, महसूल विभाग तसेच वन विभागाकडेही निवेदनाच्या प्रती देण्यात आल्या आहेत. विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी निवेदन स्वीकारल्याचे छायाचित्रांमधून दिसून येते.
दरम्यान, रस्ता तातडीने खुला करून नागरिकांची गैरसोय दूर करावी, अन्यथा १५ ऑगस्ट रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेसमोर तहसील कार्यालय, मुक्ताईनगर येथे आमरण उपोषण करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा अतुल जावरे यांनी दिला आहे.
या मागणीमुळे आता वन विभाग आणि स्थानिक प्रशासन याबाबत कोणता निर्णय घेते, याकडे हरताळा, निमखेडी तसेच मुक्ताईनगर तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

प्रकाश खिलारे हे स्थानिक समाचार डिजिटल मीडिया चे सहसंपादक असून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपण आपल्या परिसरातील बातम्या, माहिती तसेच लेख देण्याकरिता संपर्क करू शकतात…..
मो. 9112225235
Email- prakaashkhilare@gmail.com
