नीट पेपरफुटी प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई, परीक्षा व्यवस्थेतील पारदर्शकता आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळावा या मागण्यांसाठी वरणगावात महाविकास आघाडीचा निषेध मोर्चा काढण्यात आला.
देशभरात गाजत असलेल्या नीट (NEET) परीक्षा पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ आणि दिल्लीतील जंतर-मंतर येथे शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीहल्ल्याच्या विरोधात वरणगाव शहर महाविकास आघाडीच्या वतीने मंगळवारी (दि. २१) भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला. या आंदोलनात महाविद्यालयीन विद्यार्थी, महाविकास आघाडीचे विविध घटक पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित प्रश्नावर केंद्र व राज्य सरकारने गांभीर्याने भूमिका घ्यावी, परीक्षा व्यवस्थेतील पारदर्शकता कायम ठेवावी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी ठाम भूमिका आंदोलनकर्त्यांनी यावेळी मांडली.
नवीन नगरपरिषद कार्यालयापासून पोलीस ठाण्यापर्यंत मोर्चा
मोर्चाची सुरुवात वरणगाव येथील नवीन नगरपरिषद कार्यालयापासून करण्यात आली. त्यानंतर तिरंगा सर्कल मार्गे शिस्तबद्ध पद्धतीने मोर्चा काढण्यात आला. हातात भारतीय तिरंगा, भारतीय राज्यघटनेच्या प्रती तसेच सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा घेऊन आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.
मोर्चा वरणगाव पोलीस ठाण्यात पोहोचल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक अमितकुमार बागुल यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आले. निवेदन स्वीकारल्यानंतर आंदोलनाचे शांततेत विसर्जन करण्यात आले.
लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ झाल्याचा आरोप
महाविकास आघाडीने दिलेल्या निवेदनात नीट परीक्षा ही देशातील लाखो विद्यार्थ्यांच्या वैद्यकीय शिक्षणाचे भविष्य निश्चित करणारी अत्यंत महत्त्वाची परीक्षा असल्याचे नमूद करण्यात आले आहे. अशा परीक्षेत पेपरफुटी झाल्याच्या आरोपांमुळे संपूर्ण परीक्षा प्रक्रियेच्या विश्वासार्हतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, विद्यार्थी आणि पालकांमध्ये तीव्र असंतोषाचे वातावरण निर्माण झाल्याचा आरोप करण्यात आला.
स्पर्धा परीक्षांमध्ये पारदर्शकता आणि विश्वास टिकविणे ही शासनाची जबाबदारी असून, अशा घटनांमुळे प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांवर अन्याय होत असल्याचे आंदोलनकर्त्यांनी म्हटले.
जंतर-मंतर येथील विद्यार्थ्यांवरील कथित लाठीहल्ल्याचा निषेध
याच प्रकरणाच्या निषेधार्थ दिल्लीतील जंतर-मंतर येथे शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी कथित लाठीचार्ज केल्याचा आरोप करत महाविकास आघाडीने या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला.
लोकशाही व्यवस्थेत आपल्या न्याय्य मागण्यांसाठी शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर बळाचा वापर करणे अत्यंत दुर्दैवी आणि निषेधार्ह असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले.
केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान व मंत्री दादा भुसे यांच्या राजीनाम्याची मागणी
निवेदनात केंद्र सरकारकडे नीट पेपरफुटी प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी करण्यात आली. तसेच शिक्षण क्षेत्रातील प्रश्नांबाबत प्रभावी भूमिका न घेतल्याचा आरोप करत महाराष्ट्राचे मंत्री दादा भुसे यांनीही नैतिक जबाबदारी स्वीकारून पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.
दोषींवर कठोर कारवाईची मागणी
महाविकास आघाडीने आपल्या निवेदनात नीट पेपरफुटी प्रकरणाची सखोल, निष्पक्ष आणि वेळेत चौकशी करून या घोटाळ्यामागील सर्व संबंधित दोषींना तात्काळ अटक करावी, अशी मागणी केली. तसेच जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीहल्ल्यास जबाबदार असलेल्या संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवरही कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.
घोषणांनी परिसर दणाणला
मोर्चादरम्यान आंदोलनकर्त्यांनी केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. “वंदे मातरम्”, “भारत माता की जय”, “मोदी हमसे डरता है, पुलिस को आगे करता है”, “नहीं चलेगी… नहीं चलेगी… दादागिरी नहीं चलेगी”, “इंकलाब जिंदाबाद” अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला.
विविध पक्षांचे पदाधिकारी, विद्यार्थी व नागरिकांची मोठी उपस्थिती
या आंदोलनात प्रदेश सरचिटणीस रमेश पाटील, महिला जिल्हा उपाध्यक्षा प्रतिभा तावडे, दीपक मराठे, प्रा. मनोज देशमुख, चंद्रकांत शर्मा, डॉ. अहेसान अहमद, कुलदीप देशमुख, प्रा. राहुल जोहरे, संभाजी पाटील, काँग्रेसचे वरणगाव शहराध्यक्ष अशफाक काजी, नरेंद्र इंगळे, शाहरूख खान, पंकज पाटील, पी.एच. भैसे, राहुल सोनवणे, जितेंद्र तावडे, नगरसेवक निलेश चौधरी, सुनील भोई, संजीव कोळी, डॉ. सुनील अहीरराव, मनोज अग्रवाल, शे. हनीफ शे. रहिम, शे. समीर शे. खाटीक, निर्मला जवरे, अनिता निकम, विश्रांती पवार, श्रीमती एस. डी. कापसे, पूजा भिलावे, अनिता लोखंडे, अजहर सागर अली, तेजस चौधरी यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी, शेकडो विद्यार्थी, महिला कार्यकर्त्या आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा
महाविकास आघाडीने प्रशासनाला दिलेल्या निवेदनात विद्यार्थ्यांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी आणि परीक्षा व्यवस्थेतील पारदर्शकता कायम राखण्यासाठी तातडीने ठोस पावले उचलण्याची मागणी केली आहे. तसेच पेपरफुटी प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करून विद्यार्थ्यांना न्याय मिळाला नाही, तर राज्यभर आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
महाविकास आघाडीच्या या आंदोलनामुळे वरणगाव शहरात काही काळ राजकीय वातावरण तापले होते. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित प्रश्नांवर प्रशासनाने तातडीने निर्णय घेऊन परीक्षा व्यवस्थेवरील जनतेचा विश्वास पुन्हा प्रस्थापित करावा, अशी अपेक्षा आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली.

प्रकाश खिलारे हे स्थानिक समाचार डिजिटल मीडिया चे सहसंपादक असून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपण आपल्या परिसरातील बातम्या, माहिती तसेच लेख देण्याकरिता संपर्क करू शकतात…..
मो. 9112225235
Email- prakaashkhilare@gmail.com
