मासेप्रेमींना धक्का! राज्यात पावसाळी मासेमारी बंदी १५ ऑगस्टपर्यंत वाढवणार

महाराष्ट्र सरकारने मत्स्यसंपदेचे संवर्धन, माशांच्या प्रजननाला चालना आणि पावसाळ्यातील प्रतिकूल हवामानात मच्छीमारांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पावसाळी मासेमारी बंदीचा कालावधी १५ ऑगस्टपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.

माशांना प्रजननासाठी अधिक वेळ मिळावा आणि पावसाळ्यातील प्रतिकूल हवामानात मच्छीमारांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी राज्यातील मासेमारी बंदीचा कालावधी वाढविण्यात आला आहे.

 राज्यातील पावसाळी मासेमारी बंदीचा कालावधी वाढवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून, यामुळे मासेप्रेमींसह मच्छीमारांनाही आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. मत्स्यसाठ्याचे संवर्धन, माशांना प्रजननासाठी अधिक वेळ उपलब्ध करून देणे आणि पावसाळ्यातील प्रतिकूल हवामानात मच्छीमारांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ही बंदी १५ ऑगस्टपर्यंत वाढविण्यात येणार असल्याची माहिती मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी विधानसभेत दिली.

यापूर्वी राज्याच्या सागरी हद्दीत १ जून ते ३१ जुलै या ६१ दिवसांच्या कालावधीत यांत्रिक आणि यंत्रचलित मासेमारी नौकांवर बंदी लागू करण्यात येत होती. पश्चिम मान्सूनच्या आगमनाच्या काळात मत्स्यसंपदेचे संरक्षण आणि मच्छीमारांच्या सुरक्षिततेसाठी हा कालावधी निश्चित करण्यात आला होता.

मात्र, मासेमारी हंगामाच्या सुरुवातीला लहान माशांची होणारी शिकार रोखण्यासाठी बंदीचा कालावधी १५ ऑगस्टपर्यंत वाढवावा, अशी मागणी विविध मच्छीमार सहकारी संस्थांनी शासनाकडे केली होती. या मागणीच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय समित्या तसेच राज्य सल्लागार आणि सनियंत्रण समितीचे अहवाल मागविण्यात आले होते. या समित्यांनीही बंदी वाढविण्याच्या निर्णयाला सकारात्मक अभिप्राय दिला.

शासनाच्या मते, वाढीव बंदीमुळे मत्स्यसाठ्याचे संवर्धन आणि जतन करण्यास मदत होणार असून, माशांना प्रजननासाठी अधिक कालावधी मिळेल. त्यामुळे भविष्यातील मत्स्यसंपदा टिकवून ठेवणे शक्य होईल. तसेच पावसाळ्याच्या सुरुवातीला येणारे वादळी वारे, चक्रीवादळे, अवकाळी पाऊस आणि प्रतिकूल हवामानामुळे होणारी संभाव्य जीवित व वित्तहानी टाळण्यासही या निर्णयाचा फायदा होणार असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!