मोबाईलच्या विळख्यात अडकलेली आजची तरुणाई

मोबाईलच्या वाढत्या वापरामुळे तरुणाई आणि विद्यार्थ्यांच्या मानसिक, शारीरिक, सामाजिक व शैक्षणिक जीवनावर होणाऱ्या परिणामांवर प्रा. सुदर्शन किशनराव शेळके यांचा विचारप्रवर्तक लेख.

ऑनलाइन शिक्षणापासून सोशल मीडिया आणि गेमिंगपर्यंत मोबाईलच्या वाढत्या वापरामुळे तरुणांच्या मानसिक, शारीरिक आणि शैक्षणिक जीवनावर होणाऱ्या परिणामांचा आढावा.

आजचे युग हे माहिती तंत्रज्ञानाचे युग मानले जाते. या तंत्रज्ञानाच्या युगात माणूस हा माणसापासून दूर होत आहे आणि जग जवळ करत आहे. मानवाच्या मूलभूत गरजा अन्न, वस्त्र, निवारा, ह्या आहेत. पण आजच्या आधुनिक युगात मोबाईल ही एक मुख्य गरज होऊन बसली आहे. मोबाईलमुळे माणूस हा काही चांगले तर काही वाईट गुण घेत आहे. आजच्या तरुणाईमध्ये मोबाईल हे एक व्यसन बनले आहे.

आजच्या तरुण-तरुणींना एक वेळेसचे जेवण नसले तरी चालेल, पण मोबाईल आवश्यक झाला आहे. मोबाईलमध्ये इंटरनेट नसेल किंवा नेटवर्क नसेल, बॅलन्स नसेल, तर त्यांची अवस्था ही पाण्यातील माशासारखी होताना दिसून येते. त्यांच्यामध्ये चिडचिडपणा निर्माण होतो. त्यांना चैन पडत नाही. काही जण तर घरातील आजी-आजोबांवर तसेच भाऊ-बहिणीवर काहीही कारण नसताना त्यांच्यावर राग राग करतात.

मोबाईलच्या उपयोगासाठी घरातील आई-वडील तितकेच जबाबदार असताना दिसून येतात. एखादे लहान मूल रडत असेल तर त्याला शांत होण्यासाठी त्याच्या हातामध्ये मोबाईल दिला जातो आणि आई आपापली कामे करत असते. लहान मुले मोबाईलमधील गाणे ऐकणे, एखादे कार्टून पाहणे, एखादा ब्लॉग पाहणे, व्हिडिओ पाहणे, यातून त्यांचे मनोरंजन होते आणि हळूहळू ते मोबाईलच्या बळी पडू लागतात.

काही मुले तर मोबाईल हातात असल्याशिवाय जेवणसुद्धा करत नाहीत. मोबाईल समोर असेल तरच त्यांच्या तोंडामध्ये घास जातो. त्याचा परिणाम त्या मुलाच्या शरीरावर पडत असताना दिसून येतो. एवढ्या कोवळ्या वयात त्या मुलांना मोबाईलमुळे अनेक आजारांना बळी पडावे लागत आहे. जसे की, त्यांचे डोळे दुखणे, डोके दुखणे, मायग्रेनसारखा आजार उद्भवत असताना पाहावयास मिळतो आणि त्या मुलांची बौद्धिक क्षमता ही कमी-कमी होत असताना पाहावयास मिळते.

मोबाईलच्या अति वापरामुळे घरातील व्यक्तींमधील संवाद हा संपत चालला आहे. पूर्वी घरामध्ये ज्या गप्पा-गोष्टी, मनोरंजन होत असे, ते आता नाहीसे होत आहे. घरातील नातेसंबंधांमध्ये जिव्हाळा, सहानुभूती, आपुलकी दिसून येत नाही. प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल झालेला आहे, त्यामुळे कोणी कोणाला बोलण्यासाठी वेळ उरलेला नाही. आई ही मोबाईलमध्ये बिझी असते आणि लेकरांना अभ्यास करण्यासाठी सांगते. तेव्हा ती मुले अभ्यास तरी कशी करतील, याचाही विचार आईने थोडक्यात करावा.

कोरोनाच्या काळामध्ये ऑनलाइन शिकवणे सुरू करण्यात आले. ऑनलाइन शिक्षण पद्धतीमुळे सर्वांच्याच हातात मोबाईल दिसू लागले. एलकेजीपासून ते पदवी ते पदव्युत्तर या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांकडे ऑनलाइन क्लासमुळे मोबाईल आले. तसेच विविध क्षेत्रातील स्पर्धा परीक्षा, व्यावसायिक क्षेत्रातील कामे यासाठी मोबाईलचा वापर करण्यात येऊ लागला आहे. आणि शिक्षणाच्या नावाखाली आजची तरुण पिढी ही मोबाईलच्या आहारी जाताना दिसून येत आहे.

त्यांना घरातील नातेवाईकांविषयी किंवा कुठल्याही कामाविषयी काहीही वाटत नाही. फक्त आपल्या हातामध्ये मोबाईल घेऊन गेम खेळणे, चॅटिंग करणे, ऑनलाइन क्लास करणे, याशिवाय त्यांना काहीच दिसत नाही. रात्रभर जागरण करतात आणि दिवसा अकरा-बारा वाजता झोपेतून उठतात. तेव्हा त्यांच्या शरीरावर विपरीत परिणाम होताना दिसून येत आहे. त्यामुळे त्यांची मानसिक, आर्थिक, शारीरिक आणि शैक्षणिक नुकसान मोठ्या प्रमाणामध्ये होत असताना पाहावयास मिळते.

आजच्या तरुणांमध्ये असा गैरसमज निर्माण झाला आहे की, ज्यांच्याकडे जास्त किमतीचा मोबाईल आहे, त्याची प्रतिष्ठा खूप आहे. असा त्यांचा गोड गैरसमज आहे. आई-वडिलांकडे पैसे असो अथवा नसो, आपला हट्ट करून जास्त किमतीचा मोबाईल घेण्यासाठी आपल्या आई-वडिलांना प्रवृत्त करतात.

जर आई-वडिलांनी मुलांच्या इच्छेनुसार मोबाईल घेऊन दिला नाही, तर त्यांना वेगळ्या पद्धतीने ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करतात.

आजच्या तरुणाईचे एकच म्हणणे आहे…..

नको चांद-तारे,

फुलांचे पसारे,

फक्त जिथे मी बसावे,

तिथे नेटवर्क असावे…..

 

प्रा. सुदर्शन किशनराव शेळके

श्रीनिवास विद्या मंदिर कनिष्ठ महाविद्यालय, वसमत

मो. क्र. +91 98226 44781

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!