कल्याणमधील उंबडे गावातील जमीन व्यवहार प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून पोलिसांनी बीएनएस आणि अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत तपास सुरू केला आहे.
कल्याणमधील उंबडे गावातील एका वादग्रस्त आणि संवेदनशील जमीन व्यवहार प्रकरणात शिवसेना (शिंदे गट) चे माजी नगरसेवक तथा उपशहरप्रमुख सुनील वायले यांच्यासह सात जणांविरुद्ध खडकपाडा पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मयत व्यक्तीच्या नावाने बनावट कागदपत्रे तयार करून अनुसूचित जाती प्रवर्गातील कुटुंबाची फसवणूक केल्याचा आणि अन्याय केल्याचा आरोप फिर्यादी प्रमोद विश्वनाथ गायकवाड यांनी केला आहे. या प्रकरणामुळे कल्याणच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
तक्रारीनुसार हा प्रकार ८ मार्च २०२२ ते १८ जून २०२६ या कालावधीत घडला. आरोपींनी संगनमत करून एका मृत व्यक्तीला जिवंत दाखवत बनावट घोषणापत्रे व खोट्या सह्यांच्या आधारे जमीन व्यवहार केल्याचा आरोप आहे. तसेच अनुसूचित जातीतील फिर्यादींशी जाणीवपूर्वक अन्यायकारक वागणूक दिल्याचाही उल्लेख तक्रारीत करण्यात आला आहे.
खडकपाडा पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्यामध्ये सुनील राजाराम वायले, निर्मला रविकांत वायले, अलका मनोहर वायले, किसान नधू वायले, शिरीष ढवकी, सुनील मोहनदास हीरचंदानी आणि जिगी लालचंदानी यांचा समावेश आहे.
या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून जमीन व्यवहाराशी संबंधित कागदपत्रे, खरेदीखत आणि इतर पुराव्यांची छाननी केली जात आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
दरम्यान, आरोप फेटाळताना सुनील वायले यांनी हे प्रकरण राजकीय आणि आर्थिक हेतूने प्रेरित असल्याचा दावा केला आहे. आम्ही संबंधित जमीन पूर्णपणे कायदेशीर प्रक्रियेद्वारे खरेदी केली असून सर्व कागदपत्रे वैध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
या प्रकरणामुळे कल्याण परिसरातील जमीन व्यवहारांबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून पोलीस तपासातून पुढे काय सत्य समोर येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मिडिया चे संपादक असुन यांना पत्रकारितेचा १० वर्षाचा अनुभव आहे. कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मीडिया चे सक्रिय योगदानकर्ता असून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिरातींकरिता संपर्क करावा-
मो. क्र. +917507502989
ईमेल – sthaniksamacharbharat@gmail.com
