१२ प्रमुख मागण्या साठी भारत मुक्ती मोर्चा , राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भारत मुक्ती मोर्चा व राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाच्या वतीने १२ प्रमुख मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आले. आंदोलनानंतर अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले.

धार्मिक अल्पसंख्याकांच्या हक्कांसाठी जळगावात भारत मुक्ती मोर्चा व राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाचे आंदोलन. अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांना १२ प्रमुख मागण्यांचे निवेदन सादर.

देशातील धार्मिक अल्पसंख्याकांच्या हक्कांचे संरक्षण, संविधानिक मूल्यांचे पालन आणि सामाजिक न्यायाच्या विविध मागण्यांसाठी भारत मुक्ती मोर्चा व राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाच्या वतीने मंगळवारी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. आंदोलनानंतर अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांना शिष्टमंडळामार्फत मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.

या आंदोलनाचे नेतृत्व भारत मुक्ती मोर्चाचे जळगाव जिल्हाध्यक्ष देवानंद निकम आणि राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाचे राज्य उपाध्यक्ष डॉ. शाकीर शेख यांनी केले.

आंदोलनादरम्यान देशातील मुस्लीम समाजावरील कथित मॉब लिंचिंगच्या घटना, धार्मिक स्थळांवरील हल्ले, धार्मिक अल्पसंख्याकांवरील अत्याचार, संविधानिक हक्कांचे संरक्षण, सामाजिक न्याय व धार्मिक स्वातंत्र्य यासह विविध प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यात आले.

आंदोलनकर्त्यांनी वक्फ (सुधारणा) अधिनियम २०२६ रद्द करणे, संविधानातील कलम २५ ते २९ अंतर्गत धार्मिक स्वातंत्र्याचे संरक्षण, मॉब लिंचिंगच्या घटनांवर कठोर कारवाई, बेकसूर मुस्लिम तरुण व उलेमांची सुटका, कम्युनल व्हायोलन्स प्रिव्हेन्शन कायदा लागू करणे, धार्मिक स्थळांवरील हल्ले रोखणे, कलम ३४१(३) वरील बंदी उठविणे, जातनिहाय जनगणना करणे, हजरत मुहम्मद साहेब व बहुजन महापुरुषांची बदनामी रोखणे, सच्चर, गोपालसिंग, मिश्रा व कुंडू आयोगांच्या शिफारशींची अंमलबजावणी, धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या संघटनांवर बंदी घालणे तसेच प्लेसेस ऑफ वर्शिप ॲक्ट, १९९१ ची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशा १२ प्रमुख मागण्या मांडल्या.

आंदोलनात बहुजन मुक्ती पार्टीचे राज्य प्रभारी सुमित्र अहिरे, अ. करीम सालार, नियाज अली फाऊंडेशनचे अय्याज अली, फैजपूरचे माजी नगराध्यक्ष मुबारकभाई, माजी नगरसेवक रियाज बागवान, खालिद बागवान, सावरकर रिक्षा युनियनचे अध्यक्ष दिलीप सपकाळे, बहुजन मुक्ती पार्टीचे रविंद्र मोरे, खुशाल सोनवणे, रविंद्र बाविस्कर, राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाचे हाफिज फिरोज, गनी शाह, अकील कासार, मुफ्ती खालिद, रफिक शेख, इरफान शेख, जमील शेख, सै. कलीम, रिजवान शेख, पीस पार्टीचे आरिफ देशमुख, भारत मुक्ती मोर्चाचे जाकीर कुरेशी, दिलीप जाधव, डी. एम. भालेराव, मनोहर लोखंडे, त्र्यंबक सोनवणे, रमेश थाटे, दिलीप इंगळे, बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कचे चंद्रशेखर अहिरराव, दिनेश सपकाळे, सुनील सपकाळे, प्रा. किसन हेरोळे, शैलेश नन्नवरे, राष्ट्रीय मूलनिवासी पेन्शनर संघाचे मनोहर कोचुरे, सुनील सोनवणे, दिलीप तासखेडकर, संतोष साळवे, तबन ह्याळिंगे यांच्यासह विविध सामाजिक संघटनांचे शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

आंदोलनानंतर शिष्टमंडळाने अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन केंद्र व राज्य शासनाने या मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!