ठाणे ग्रामीण पोलिसांनी पर्यवेक्षकाच्या हत्येप्रकरणी दोन कर्मचाऱ्यांना अटक केली असून न्यायालयाने त्यांना २४ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
कंपनीतील वरिष्ठ अधिकाऱ्याकडून होत असलेल्या कथित लैंगिक छळाला कंटाळून दोन कर्मचाऱ्यांनी पर्यवेक्षकाची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी सौरभ गोल्हे (२४) आणि ज्ञानेश्वर कंठे (२८) यांना अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना २४ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांनी दिली.
कल्याण-अहिल्यानगर मार्गावरील मामनोली परिसरात २८ जून रोजी एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. मृताची ओळख पटत नसल्याने कल्याण तालुका पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड आणि अपर पोलीस अधीक्षक अनमोल मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली सहा विशेष पथके तयार करून तपास सुरू करण्यात आला.
तपासादरम्यान मृताच्या शर्टवरील एका कंपनीचे बोधचिन्ह पोलिसांच्या निदर्शनास आले. संबंधित कंपनी मुरबाड परिसरातील असल्याचे समोर आल्यानंतर तेथील कर्मचाऱ्यांची चौकशी करण्यात आली. त्यातून मृताची ओळख किशोरचंद्र साहू (४२) अशी पटली. साहू हे संबंधित कंपनीत पर्यवेक्षक म्हणून कार्यरत होते.
त्यानंतर कंपनीतील सीसीटीव्ही फुटेज आणि कर्मचाऱ्यांच्या चौकशीतून सौरभ गोल्हे आणि ज्ञानेश्वर कंठे यांच्यावर संशय बळावला. दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
आठवडाभर आधी आखला कट
पोलिसांच्या माहितीनुसार, किशोरचंद्र साहू हे मुरबाड तालुक्यातील देवगाव येथील रहिवासी होते. ते विवाहित असून त्यांची पत्नी मूळगावी ओडिशामध्ये राहते. आरोपी सौरभ गोल्हे हा रायता, तर ज्ञानेश्वर कंठे हा किन्हवली परिसरातील रहिवासी आहे.
चौकशीदरम्यान आरोपींनी असा दावा केला की, साहू हे त्यांच्यावर वारंवार समलिंगी संबंधांसाठी दबाव टाकत होते. वरिष्ठ अधिकारी असल्याने त्यांना विरोध करणे कठीण जात होते आणि त्यामुळे ते मानसिक तणावाखाली होते. या कथित छळाला कंटाळून त्यांनी साहू यांच्या हत्येचा कट रचला.
यासाठी आरोपींनी आठवडाभरापूर्वी धारदार शस्त्र खरेदी केले. २५ जून रोजी सौरभ गोल्हे याने दुचाकीवरून किशोरचंद्र साहू यांना मामनोली परिसरात नेले. तेथे धारदार शस्त्राने गळ्यावर वार करून त्यांची हत्या करण्यात आली. त्यानंतर मृतदेह जंगलात फेकून देण्यात आला. निर्जन ठिकाणी मृतदेह तीन दिवस पडून राहिल्यानंतर २८ जून रोजी तो आढळून आला.
दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना २४ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास ठाणे ग्रामीण पोलीस करत आहेत.

कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मिडिया चे संपादक असुन यांना पत्रकारितेचा १० वर्षाचा अनुभव आहे. कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मीडिया चे सक्रिय योगदानकर्ता असून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिरातींकरिता संपर्क करावा-
मो. क्र. +917507502989
ईमेल – sthaniksamacharbharat@gmail.com
