भिवंडीत एफडीएच्या कारवाईची भीती दाखवत हॉटेल व्यावसायिकाकडे ५० हजारांच्या खंडणीची केली मागणी

भिवंडीतील धामणकर नाका परिसरातील हॉटेल व्यावसायिकाला अन्न व औषध प्रशासन (एफडीए) आणि पोलिसांच्या कारवाईची भीती दाखवून ५० हजार रुपयांच्या खंडणीची मागणी केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी नारपोली पोलिसांनी दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

एफडीए आणि पोलिसांच्या कारवाईचे नाव सांगून भिवंडीतील हॉटेल व्यावसायिकाला धमकावून खंडणी मागितल्याच्या प्रकरणाचा नारपोली पोलीस तपास करत आहेत.

 राज्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आदेशानुसार भेसळयुक्त अन्नपदार्थांविरोधात विशेष मोहीम सुरू असतानाच, भिवंडीत एका हॉटेल व्यावसायिकाकडे कारवाईची धमकी देत खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी दोन जणांविरोधात नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भिवंडीतील गौरीपाडा परिसरातील हॉटेल व्यावसायिक मोहम्मद मतलीफ आलम हसीर शेख यांचे धामणकर नाका येथील ‘साईदीप’ नावाचे हॉटेल आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, काही दिवसांपूर्वी एक व्यक्ती ग्राहक म्हणून हॉटेलमध्ये आला होता. त्याने चहा आवडल्याचे सांगत वापरल्या जाणाऱ्या चहापावडरची माहिती घेत पुरवठादाराचा मोबाईल क्रमांकही मिळवला.

त्यानंतर संबंधित व्यक्ती वारंवार हॉटेलमध्ये येऊन चहापावडरबाबत विचारणा करत होता. ३० जून रोजी दुपारी दीडच्या सुमारास तो पुन्हा हॉटेलमध्ये आला आणि चहापावडरमध्ये भेसळ असल्याचा आरोप करत अन्न व औषध प्रशासन आणि पोलिसांना बोलावून कारवाई करण्याची धमकी दिली.

ही कारवाई टाळण्यासाठी ५० हजार रुपये द्यावे लागतील, अशी मागणी केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. याच आधारे हितेश पद्माकर मालणकर आणि सिराज या दोघांविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!