शनिपेठ पोलिसांची बालविवाहाविरोधात कठोर कारवाई; जळगाव शहरातील दोन बालविवाह रोखले;जमुना नगर व कांचन नगरातील विवाह सोहळे वेळीच थांबविले; नियम मोडणाऱ्यांवर थेट फौजदारी कारवाईचा इशारा

जळगाव शहरातील जमुना नगर आणि कांचन नगर येथे शनिपेठ पोलिसांनी तातडीची कारवाई करून दोन बालविवाह रोखले; बालविवाह प्रतिबंधक कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्याचा इशारा.

जळगावातील बालविवाहविरोधी मोहिमेला वेग. शनिपेठ पोलिसांनी दोन बालविवाह रोखत नागरिकांना माहिती देण्याचे आवाहन केले.

 बालविवाहासारख्या सामाजिक अनिष्ट प्रथेविरोधात शनिपेठ पोलिसांनी कठोर भूमिका घेत जळगाव शहरातील दोन बालविवाह रोखण्यात यश मिळविले आहे. जमुना नगर आणि कांचन नगर परिसरात होणारे हे विवाह पोलिसांच्या सतर्कतेमुळे वेळेवर थांबविण्यात आले. यापुढे शनिपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत बालविवाह आढळून आल्यास कोणतेही पूर्व समुपदेशन न करता थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.

शनिपेठ पोलीस ठाण्याने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकानुसार, २२ जून २०२६ रोजी जळगाव शहरातील जमुना नगर परिसरात होणारा बालविवाह पोलिसांनी हस्तक्षेप करून रोखला. त्यानंतर १० जुलै २०२६ रोजी कांचन नगर येथील बिंदुबाई हॉलमध्ये होणारा आणखी एक बालविवाहही पोलिसांच्या तत्पर कारवाईमुळे थांबविण्यात आला.

दोन्ही घटनांमध्ये पोलिसांनी तातडीने कारवाई करत अल्पवयीन मुला-मुलींचे विवाह होण्यापासून प्रतिबंध केला. या कारवाईनंतर शनिपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत बालविवाह निर्मूलनासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत असून, अशा प्रकारच्या घटनांवर २४ तास लक्ष ठेवण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

पालकांसह संबंधित सर्वांवर होणार कारवाई

पोलिसांनी स्पष्ट केले आहे की, बालविवाहाच्या प्रकरणात केवळ मुला-मुलींचे पालकच नव्हे, तर विवाहास संमती देणारे नातेवाईक, विवाह लावणारे पुरोहित किंवा काझी, मंडप सजावट करणारे व्यावसायिक, बँड पथक, वाजंत्री तसेच छायाचित्रकार यांच्यावरही कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

बालविवाह प्रतिबंधक कायदा २००६ नुसार विवाहासाठी मुलीचे किमान वय १८ वर्षे आणि मुलाचे किमान वय २१ वर्षे असणे बंधनकारक आहे. यापेक्षा कमी वयात विवाह लावल्यास संबंधितांविरोधात अजामीनपात्र गुन्हा दाखल होऊ शकतो. दोषी आढळल्यास दोन वर्षांपर्यंत सक्तमजुरीची शिक्षा आणि एक लाख रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. तसेच संबंधित व्यावसायिकांचे परवाने रद्द करण्याची कारवाईही केली जाऊ शकते.

पोलीस प्रशासनाचे नागरिकांना आवाहन

बालविवाहासंदर्भात कोणतीही माहिती मिळाल्यास नागरिकांनी त्वरित पोलिसांना कळवावे, असे आवाहन शनिपेठ पोलिसांनी केले आहे. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांची कोणत्याही परिस्थितीत गय केली जाणार नाही, असेही पोलिसांनी स्पष्ट केले.

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. शनिपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विशाल दातीर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या विशेष पथकाने या मोहिमेत सहभाग घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!