ठाणे जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या बारवी धरणातील पाणीसाठा ५४ टक्क्यांवर पोहोचला आहे. सलग मुसळधार पावसाची गरज जलसंपदा विभागाने व्यक्त केली आहे.
ठाणे जिल्ह्याची तहान भागवणाऱ्या बारवी धरणाच्या पाणीसाठ्यात पुन्हा वाढ होऊ लागली आहे. पाणलोट क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाने जोर धरल्याने रविवारी (१९ जुलै) धरणातील उपयुक्त पाणीसाठा ५४.२३ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. मात्र, गेल्या वर्षीच्या तुलनेत धरणातील साठा अद्याप २४ टक्क्यांनी कमी असल्याने प्रशासनाचे लक्ष आगामी पावसाकडे लागले आहे.
जून महिन्यात पावसाने ओढ दिल्यानंतर जुलैच्या पहिल्या आठवड्यात जोरदार पाऊस झाला होता. ८ आणि ९ जुलै रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणाचा साठा वेगाने वाढून ४८.२७ टक्क्यांवर पोहोचला होता. मात्र त्यानंतर पावसाने विश्रांती घेतल्याने पाणीसाठा वाढीचा वेग मंदावला. सलग सहा दिवसांच्या खंडानंतर १६ जुलै रोजी धरणाने ५० टक्क्यांचा टप्पा गाठला.
गेल्या दोन-तीन दिवसांपासून पुन्हा पावसाचा जोर वाढला असून १९ जुलै रोजी धरण क्षेत्रात ३६ मिमी पावसाची नोंद झाली. त्यामुळे धरणातील उपयुक्त पाणीसाठा १८४.७८ दशलक्ष घनमीटर इतका झाला असून धरणाची पाणीपातळी ६६.०० मीटरवर पोहोचली आहे. धरणाची पूर्ण क्षमतेची (ओव्हरफ्लो) पातळी ७२.६० मीटर आहे. यंदाच्या हंगामात आतापर्यंत १,२०१ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
गेल्या वर्षाच्या तुलनेत मोठी तूट
गतवर्षी १९ जुलै रोजी बारवी धरणात ७८.१९ टक्के म्हणजेच २६४.९७ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा उपलब्ध होता. त्यावेळी पाणलोट क्षेत्रात १,६४९ मिमी पावसाची नोंद झाली होती. तुलनेत यंदा धरणातील साठा सुमारे २४ टक्क्यांनी कमी असून पावसातही ४४८ मिमीची तूट आहे.
यंदाच्या अनियमित पावसामुळे धरणातील साठा अपेक्षित वेगाने वाढलेला नसल्याने आगामी काळात पाणलोट क्षेत्रात सलग आणि मुसळधार पाऊस होणे आवश्यक असल्याचे जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांचे मत आहे. त्यामुळेच बारवी धरण पूर्ण क्षमतेने भरून ठाणे जिल्ह्याच्या पाणीपुरवठ्याबाबतची चिंता दूर होऊ शकणार आहे.

कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मिडिया चे संपादक असुन यांना पत्रकारितेचा १० वर्षाचा अनुभव आहे. कौस्तुभ शिंदे हे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिरातींकरिता संपर्क करावा-
मो. क्र. +917507502989, ईमेल – sthaniksamacharbharat@gmail.com
