मुक्ताईनगर तालुक्यात भीषण आग दुर्घटना; शॉर्टसर्किटमुळे शेतकऱ्याच्या गोठ्याला आग लागून १० शेळ्यांचा होरपळून मृत्यू, ग्रामस्थांकडून मदतीची मागणी.
मुक्ताईनगर तालुक्यातील निमखेडी खुर्द येथे रविवारी रात्री भीषण आग लागून एका शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले. विद्युत डी.पी.मध्ये झालेल्या शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत असून, या दुर्घटनेत १० शेळ्या आणि चार ते पाच पिल्लांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तसेच शेतीसाठी साठवून ठेवलेला चारा, घरगुती साहित्य आणि शेती उपयोगी वस्तू जळून खाक झाल्या.
मिळालेल्या माहितीनुसार, पवन दामोदर चिखलकर (वय २५, रा. निमखेडी खुर्द, ता. मुक्ताईनगर) यांच्या शेतालगत महावितरण कंपनीचा विद्युत डी.पी. आहे. रविवारी रात्री सुमारे ११.३० वाजेच्या सुमारास डी.पी.मध्ये अचानक शॉर्टसर्किट झाले. त्यातून निघालेल्या ठिणग्या शेजारील शेतात साठवून ठेवलेल्या शेणखत व कोरड्या चाऱ्यावर पडल्याने काही क्षणात आगीने रौद्र रूप धारण केले.
आगीची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत पाण्याच्या साहाय्याने आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र आग वेगाने पसरल्याने शेतातील गोठा आणि त्यामध्ये बांधलेल्या शेळ्यांना बाहेर काढण्यास वेळ मिळाला नाही. यात १० मोठ्या शेळ्या व काही पिल्लांचा जागीच मृत्यू झाला.
या आगीत चिखलकर यांच्या घरालगत ठेवलेला गहू, ज्वारी, जनावरांचा चारा, ठिबक सिंचन साहित्य तसेच विविध शेती अवजारे जळून खाक झाली. घटनेमुळे कुटुंबावर मोठे आर्थिक संकट ओढवले असून लाखोंचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासनातील अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. आमदार चंद्रकांत पाटील यांनी घटनास्थळी भेट देत नुकसानीची पाहणी केली. त्यांनी संबंधित महावितरण अधिकारी तसेच महसूल विभागाशी चर्चा करून तातडीने पंचनामा करण्याच्या सूचना दिल्या.
महसूल व पोलिस प्रशासनाने घटनास्थळी पंचनामा सुरू केला असून नुकसानग्रस्त शेतकऱ्याला शासनाकडून आर्थिक मदत देण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. तसेच गावकऱ्यांनी परिसरातील जुन्या व धोकादायक विद्युत डी.पी.ची तपासणी करून दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे.
या घटनेमुळे निमखेडी खुर्द परिसरात हळहळ व्यक्त होत असून, शेतकऱ्यांच्या सुरक्षेसाठी महावितरणने आवश्यक ती खबरदारी घ्यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मिडिया चे संपादक असुन यांना पत्रकारितेचा १० वर्षाचा अनुभव आहे. कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मीडिया चे सक्रिय योगदानकर्ता असून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिरातींकरिता संपर्क करावा-
मो. क्र. +917507502989
ईमेल – sthaniksamacharbharat@gmail.com
