घाण व दुर्गंधीयुक्त पाण्यात चहाच्या किटल्या धुतल्याच्या व्हायरल व्हिडिओनंतर नालासोपारा स्थानक परिसरातील खाद्यविक्रेत्यांच्या स्वच्छतेच्या नियमांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
रेल्वे स्थानक परिसरातील प्रवाशांच्या आरोग्याशी खेळ करणारा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नालासोपारा पूर्व रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ४ समोरील रस्त्यावर साचलेल्या घाण व दुर्गंधीयुक्त पाण्यात एका चहा विक्रेत्याने चहाच्या किटल्या धुतल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. या प्रकारामुळे प्रवाशांसह स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये संबंधित चहा विक्रेता रस्त्यावर साचलेल्या अस्वच्छ पाण्यात चहाच्या किटल्या धुताना स्पष्टपणे दिसून येत आहे. नालासोपारा रेल्वे स्थानक परिसर हा नेहमीच प्रवाशांच्या गर्दीने गजबजलेला असतो. दररोज हजारो नागरिक या परिसरातून प्रवास करतात. अशा ठिकाणी खाद्यपदार्थ विक्रेत्याकडून स्वच्छतेच्या नियमांची खुलेआम पायमल्ली होत असल्याने अन्नसुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
पावसाळ्यात दूषित पाण्यामुळे विविध संसर्गजन्य आजारांचा धोका वाढतो. अशा परिस्थितीत चहा बनविण्यासाठी वापरण्यात येणारी भांडी घाण पाण्यात धुतल्याने नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. कॉलरा, टायफॉइड, गॅस्ट्रो यांसारख्या आजारांना आमंत्रण देणाऱ्या या प्रकारामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या अशा विक्रेत्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. केवळ आर्थिक फायद्यासाठी स्वच्छतेच्या नियमांकडे दुर्लक्ष करणाऱ्यांवर प्रशासनाने तातडीने कारवाई करावी, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.
या घटनेनंतर रेल्वे प्रशासन, स्थानिक महापालिका तसेच अन्न व औषध प्रशासनाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. प्रशासनाने व्हायरल व्हिडिओची दखल घेऊन संबंधित चहा विक्रेत्याचा शोध घ्यावा, त्याच्यावर कायदेशीर कारवाई करावी आणि स्थानक परिसरातील सर्व खाद्यविक्रेत्यांची स्वच्छता व अन्न गुणवत्तेची तपासणी करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मिडिया चे संपादक असुन यांना पत्रकारितेचा १० वर्षाचा अनुभव आहे. कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मीडिया चे सक्रिय योगदानकर्ता असून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिरातींकरिता संपर्क करावा-
मो. क्र. +917507502989
ईमेल – sthaniksamacharbharat@gmail.com
