मुंबईतील बेस्टच्या भाडेतत्त्वावरील बसांच्या वाढत्या अपघातांमुळे नागरिकांमध्ये चिंता. एअर प्रेशर गळती, ब्रेक निकामी आणि बेपर्वा वाहनचालकांमुळे सुरक्षेचा मुद्दा पुन्हा चर्चेत.
बेस्टच्या भाडेतत्त्वावरील बसांचा प्रवास तांत्रिक बिघाड, अपुरे प्रशिक्षण आणि चालकांच्या निष्काळजीपणामुळे दिवसेंदिवस धोकादायक ठरत आहे. जानेवारी ते मे २०२६ या पाच महिन्यांत या बसांचे २४९ अपघात झाले असून, त्यात १० जणांचा मृत्यू तर ४६ जण जखमी झाले आहेत. विशेष म्हणजे मे महिन्यात सर्वाधिक ९९ अपघातांची नोंद झाल्याने प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
बेस्ट उपक्रमाच्या २,८०१ बसच्या माध्यमातून दररोज २२-२३ लाख प्रवासी प्रवास करतात. बेस्टने प्रवाशांच्या गारेगार प्रवास व पर्यावरण संवर्धनासाठी विद्युत एसी बसचा समावेश ताफ्यात करण्यास सुरुवात केली. मात्र या भाडेतत्त्वावरील बसच्या अपघातात वाढ झाली आहे. भाडेतत्वाअंतर्गत चालवल्या जाणाऱ्या बस आणि ‘ऑलेक्ट्रा’ कंपनीच्या विद्युत बसच्या अपघातांची आकडेवारी चिंताजनक आहे.त्यामुळे मुंबईची दुसरी लाईफलाइन पादचारी, प्रवाशांसाठी मृत्यूचा सापळा ठरत असल्याची प्रतिक्रिया उमटत आहे.
बेस्टच्या ताफ्यात कंत्राटदारांद्वारे चालवल्या जाणाऱ्या भाडेतत्वावरील बसची संख्सा जास्त आहे. उपक्रमाच्या २,८०१ बसपैकी २,५५३ बस खाजगी कंत्राटदारांद्वारे चालवल्या जातात, तर केवळ २४९ बस बेस्टच्या मालकीच्या आहेत. भाडेतत्वावरील बस शहरातील ४०० मार्गांपैकी ३४९ मार्गांवर दररोज २५,७०० पेक्षा जास्त फेऱ्या करतात. परिणामी भाडेतत्वावरील बस मुंबई शहराच्या बस वाहतूक व्यवस्थेचा कणा बनल्या आहेत.
मे महिन्यात सर्वाधिक (९९) अपघातांची नोंद झाली, त्याखालोखाल मार्च (९६) आणि एप्रिल (९२) यांचा क्रमांक लागतो. जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये प्रत्येकी तीन मृत्यूंची नोंद झाली, तर मे महिन्यात दोन मृत्यूंची नोंद झाली. अलीकडील अपघातांच्या मालिकेनंतर भाडेतत्वावरील बसची चिंता अधिकच वाढली आहे. ४ जून रोजी, मालाडमध्ये एका वेट-लीज बसने ओला चालकाला धडक दिली. चार दिवसांनंतर, दादरजवळ एका उभ्या असलेल्या क्रेन आणि टॅक्सीला धडक दिल्यानंतर एका विद्युत बसचा अपघात झाला.त्यात एका मोटारसायकलस्वाराचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले. २४ जून रोजी, कुलाबा डेपोमध्ये प्रवेश करताना आणखी एका बसची टॅक्सीला धडक बसली. ८ जुलै रोजी, भांडुपमध्ये एक बस अनियंत्रितपणे मागे जाऊन पुढे गेल्याने एका पादचाऱ्याला गंभीर दुखापत झाली. दोन दिवसांनंतर, अंधेरी पश्चिममध्ये बसमार्ग क्रमांक २४२ च्या बसवरील नियंत्रण सुटले आणि ती १४ वाहनांना धडकली.
अपघाताचे कारण ५० टक्के पेक्षा जास्त भाडेतत्त्वावरील बसमध्ये एअर प्रेशर गळती आणि ब्रेक निकामी होण्याची समस्या कंत्राटदारांकडून बसची नियमित व योग्य दुरुस्तीचा अभाव खासगी चालकांची बेपर्वा व वेगात बस चालवणे यांमुळे निष्पाप पादचारी आणि प्रवाशांचे जीव धोक्यात
अपघाताची आकडेवारी
- महिना—–अपघात—मृत्यु—-जखमी
- जानेवारी—- ८१— ३—१३
- फेब्रुवारी— ४५— ३ — ५
- मार्च— ९६—-२—-७
- एप्रिल—— ९२—०—-१०
- मे—-९९ —-२ — ११

कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मिडिया चे संपादक असुन यांना पत्रकारितेचा १० वर्षाचा अनुभव आहे. कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मीडिया चे सक्रिय योगदानकर्ता असून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिरातींकरिता संपर्क करावा-
मो. क्र. +917507502989
ईमेल – sthaniksamacharbharat@gmail.com
