अमरावतीच्या मेळघाटातील डोमा आश्रमशाळेत ‘भूत’ असल्याच्या अफवेने विद्यार्थी घरी गेले. ‘मास हिस्टेरिया’ची शक्यता व्यक्त; समुपदेशनाला सुरुवात.
मेळघाटातील डोमा येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेत ‘भूत’ असल्याच्या अफवेमुळे ६०० हून अधिक विद्यार्थ्यांनी भीतीपोटी शाळा सोडून घर गाठल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेनंतर विद्यार्थ्यांच्या मनातील भीती दूर करून त्यांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने (अंनिस) पुढाकार घेतला आहे.
अंनिसच्या पथकाकडून प्रत्यक्ष पाहणी
डोमा येथील आश्रमशाळेतील काही विद्यार्थिनींना अचानक त्रास जाणवल्यानंतर शाळेत ‘भूत’ असल्याची अफवा पसरली. या अफवेमुळे विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आणि ६०० हून अधिक विद्यार्थ्यांनी शाळा सोडून घरी जाणे पसंत केले.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर अंनिसच्या राज्य कार्यकारिणी सदस्या नंदिनी जाधव (पुणे), रामभाऊ डोंगरे (नागपूर) आणि प्रवीण देशमुख (मुंबई) यांनी मेळघाटातील दुर्गम भागात जाऊन परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली.
पालक आणि विद्यार्थ्यांचे समुपदेशन
अंनिसच्या कार्यकर्त्यांनी डोमा, पाचडोंगरी, खडीमल आणि चुनकडी यांसह विविध गावांमध्ये जाऊन पालक तसेच शाळा सोडून घरी गेलेल्या विद्यार्थिनींशी संवाद साधला. पावसाळी वातावरण आणि खराब रस्त्यांची पर्वा न करता कार्यकर्ते घरोघरी जाऊन विद्यार्थी आणि पालकांचे समुपदेशन करत आहेत.
समुपदेशनामुळे अनेक विद्यार्थिनींच्या मनातील भीती कमी झाली असून त्या पुन्हा शाळेत जाण्यास तयार झाल्याचे अंनिसकडून सांगण्यात आले.
‘भूत’ नसल्याचे अंनिसचे स्पष्टीकरण
शाळेत कोणत्याही प्रकारची अलौकिक शक्ती किंवा ‘भूत’ असल्याचे आढळून आलेले नाही. विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण झालेल्या भीतीमुळे ही अफवा पसरल्याचे अंनिसच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.
“आम्ही अंनिसचे कार्यकर्ते स्वतः त्या आश्रमशाळेत रात्री राहिलो आहोत. त्यामुळे पालकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये,” असे अंनिसच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या नंदिनी जाधव यांनी सांगितले. विद्यार्थिनींचे शिक्षण अर्धवट राहू नये यासाठी पालकांनी मुलांना पुन्हा शाळेत पाठवावे, असे आवाहनही त्यांनी केले.
‘मास हिस्टेरिया’ची शक्यता
डोमा येथील आश्रमशाळेत २६३ मुले आणि ३४५ मुली निवासी शिक्षण घेतात. काही दिवसांपूर्वी एका विद्यार्थिनीमध्ये अचानक ओरडणे, रडणे, शांत बसणे आणि मोठ्याने हसणे अशी वेगवेगळी लक्षणे दिसून आली. त्यानंतर काही विद्यार्थिनींमध्येही अशाच प्रकारचे वर्तन दिसू लागले.
या प्रकाराची कारणमीमांसा करण्यासाठी अमरावतीहून विशेष समुपदेशन पथकही दाखल झाले होते. मात्र, या वर्तनामागील नेमके कारण स्पष्ट झाले नाही. दरम्यान, तज्ज्ञांनी हा प्रकार ‘मास हिस्टेरिया’ म्हणजेच सामूहिक मानसिक तणावाशी संबंधित असण्याची शक्यता व्यक्त केली आहे.
‘भूमका’कडून पूजा–अर्चा
दरम्यान, काही दिवसांपूर्वी एका विद्यार्थिनीचे नातेवाईक तिला थेट वसतिगृहात घेऊन आले होते. त्यानंतर वसतिगृहात स्थानिक ‘भूमका’कडून पूजा-अर्चा करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
शा घटनांमुळे विद्यार्थ्यांच्या मनातील भीती आणखी वाढण्याची शक्यता असल्याने अफवांऐवजी विद्यार्थ्यांना योग्य समुपदेशन आणि आवश्यक वैद्यकीय मदत मिळणे गरजेचे असल्याचे अंनिसकडून सांगण्यात आले आहे.

कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मिडिया चे संपादक असुन यांना पत्रकारितेचा १० वर्षाचा अनुभव आहे. कौस्तुभ शिंदे हे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिरातींकरिता संपर्क करावा-
मो. क्र. +917507502989, ईमेल – sthaniksamacharbharat@gmail.com
