शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या संपाचा पाचवा दिवस; आंदोलन तीव्र, रिक्त पदे भरण्याची व अश्वासित योजना लागू करण्याची मागणी

प्रलंबित मागण्यांसाठी शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे आंदोलन अधिक तीव्र झाले असून रिक्त पदे भरणे आणि अश्वासित योजना लागू करण्याची मागणी जोर धरत आहे.

जळगावातील विद्यापीठ परिसर शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या घोषणांनी दणाणून गेला असून प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलनाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली आहे.

महाराष्ट्र राज्य विद्यापीठे व महाविद्यालयीन सेवक कृती संघाने पुकारलेल्या संपाला राज्यातील सार्वजनिक विद्यापीठे व संलग्न महाविद्यालयांतील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळत असून प्रलंबित मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाचा आज पाचवा दिवस आहे.

दि. १४ मे पासून सुरू असलेल्या या आंदोलनात आज दुसऱ्या टप्प्याला सुरुवात करण्यात आली. यावेळी शासनाविरुद्ध जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. विद्यापीठ परिसर घोषणांनी दणाणून गेला.

आंदोलनादरम्यान कर्मचाऱ्यांनी विविध घोषणा देत आपला रोष व्यक्त केला. “कर्मचारी संघटनेचा विजय असो”, “भिक नको हक्क हवा”, “कोण म्हणत देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही”, “अन्याय करणाऱ्या सरकारचा निषेध असो”, “रिक्त पदे भरलीच पाहिजेत”, “शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांवरील ताण कमी झालाच पाहिजे”, “१०, २०, ३० अश्वासित योजना लागू झालीच पाहिजे” अशा घोषणांनी परिसरात वातावरण तापले.

आंदोलनाचा दुसरा टप्पा सुरू झाल्याची अधिकृत घोषणा यावेळी करण्यात आली. द्वारसभेनंतर संघटनेचे अध्यक्ष महेश पाटील, मागासवर्गीय संघटनेचे अध्यक्ष राजू सोनवणे आणि सचिव अरुण सपकाळे यांनी कर्मचाऱ्यांना संबोधित करून पुढील आंदोलनाची दिशा स्पष्ट केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!