आदर्श शाळेबाहेरील वृक्षतोडीमुळे भुसावळमध्ये संतापाची लाट. पर्यावरण संवर्धन समिती आक्रमक; कारवाई न झाल्यास उपोषणाची चेतावणी.
भुसावळ शहरातील आदर्श शाळेबाहेर असलेल्या तीन मोठ्या हिरव्यागार वृक्षांची विनापरवाना कत्तल केल्याप्रकरणी ‘पर्यावरण संवर्धन व विकास समिती’ आक्रमक झाली आहे. या बेकायदेशीर वृक्षतोडीबाबत संबंधित शाळा प्रशासन व दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अन्यथा २८ मे पासून आमरण उपोषण करण्याचा इशारा समितीने मुख्याधिकारी व प्रभारी नगराध्यक्षांना निवेदनाद्वारे दिला आहे.
निवेदनात म्हटले आहे की, भरदिवसा कोणतीही अधिकृत परवानगी न घेता ही वृक्षतोड करण्यात आली. ‘महाराष्ट्र नागरी क्षेत्र झाडांचे जतन अधिनियम १९७५’ मधील कलम ८ चे हे थेट उल्लंघन आहे. नगरपरिषदेचे अधिकारी श्री. धनराज बाविस्कर यांनीही या वृक्षतोडीसाठी कोणतीही परवानगी दिली नसल्याचे स्पष्ट केले आहे.
समितीच्या वतीने खालील प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत:
* संबंधित शाळेचे मुख्याध्यापक, संस्थाचालक आणि वृक्षतोड करणाऱ्यांवर तात्काळ FIR दाखल करावा.
* २७ मे २०२६ पर्यंत प्रशासनाने ठोस कारवाई करावी.
* कारवाई न झाल्यास २८ मे रोजी सकाळी ११ वाजेपासून नगरपरिषद कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल.
या निवेदनावर पर्यावरण संवर्धन व विकास समितीचे जळगाव जिल्हाध्यक्ष देवेंद्र वराडे (अप्पा), तालुकाध्यक्ष पवन नाले, मुरलीधर लोखंडे, शेखर धांडे, प्रांजल पाटील तसेच दीपक वाणी, मयूर सुरवाडे यांसह समस्त भुसावळकर नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत. या प्रकरणामुळे शहरात पर्यावरणाप्रती जागरूक असलेल्या नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

करण शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मीडिया चे सक्रिय योगदानकर्ता असून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात.स्थानिक समाचार डिजिटल मीडिया चे प्राधिनिधी असून बातम्या आणि जाहिरातींकरीता संपर्क करावा-
✍️ करण (गुरू) शिंदे -8983956862
ईमेल- journalistgurubaba@gmail.com
