शनिपेठ पोलीस ठाण्यावरच पोलीस अधीक्षकांची कारवाई; लाचखोरी प्रकरणात नाईक बडतर्फ, निरीक्षकांची केली बदली

जळगावच्या शनिपेठ पोलीस ठाण्यात लाचखोरी प्रकरण उघडकीस आल्यानंतर पोलीस अधीक्षकांनी धडक कारवाई करत नाईकाला बडतर्फ व निरीक्षकांची बदली केली.

शनिपेठ पोलीस ठाण्यावर कठोर कारवाई; एसीबी कारवाईनंतर पोलीस अधीक्षकांचा मोठा निर्णय.

पार्श्वभूमीवर शनिपेठ पोलीस ठाण्यावर अखेर कठोर कारवाई करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी धडक निर्णय घेत पोलीस नाईक विनोद अहिरे याला सेवेतून थेट बडतर्फ केले, तर पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांची तातडीने नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून शनिपेठ परिसरात दोन गटांमध्ये झालेल्या हाणामारीच्या घटनांमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनांमुळे पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असतानाच, पोलीस नाईक विनोद अहिरे याला एक लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात पकडले. या प्रकारामुळे संपूर्ण प्रकरण अधिकच गंभीर बनले असून पोलीस दलाच्या प्रतिमेला धक्का बसल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.

या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षकांनी तातडीने हस्तक्षेप करत कठोर निर्णय घेतला. विनोद अहिरे याच्या बडतर्फीचे आदेश देण्यात आले, तर ठाण्याच्या प्रभारी अधिकारी कावेरी कमलाकर यांची बदली करण्यात आली. शनिपेठ पोलीस ठाण्याचा तात्पुरता पदभार सहाय्यक पोलीस निरीक्षक साजीद मन्सुरी यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.

दरम्यान, या घटनेनंतर जिल्ह्यातील सर्व पोलीस अधिकाऱ्यांची तातडीची गुन्हे आढावा बैठक घेण्यात आली. संवेदनशील प्रकरणांमध्ये होणारी दिरंगाई, शिस्तभंग तसेच कार्यपद्धतीतील त्रुटींवर वरिष्ठांनी तीव्र नाराजी व्यक्त करत संबंधित अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली.

या धडक कारवाईमुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली असून, भविष्यात अशा प्रकारच्या गैरप्रकारांना आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. नागरिकांचा विश्वास पुन्हा संपादन करण्यासाठी पोलीस प्रशासनाने अधिक पारदर्शक आणि जबाबदार भूमिका घेण्याची गरज अधोरेखित होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *