जळगाव जिल्ह्यात ‘उष्माघात कक्ष’ उभारण्याची मागणी. पर्यावरण संवर्धन व विकास समितीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन.

उष्माघाताचा वाढता धोका लक्षात घेता जळगावमध्ये तातडीने मदत केंद्र सुरू करण्याची मागणी; ORS, पाणी व प्राथमिक उपचारांची गरज अधोरेखित.

जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढत असलेल्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. उन्हाच्या तीव्र झळांमुळे उष्माघाताचा धोका वाढत असल्याने जळगाव जिल्ह्यातील प्रमुख रहदारीच्या ठिकाणी तात्पुरते ‘उष्माघात कक्ष’ (Heat Stroke Relief Center) उभारण्यात यावेत, अशी मागणी पर्यावरण संवर्धन व विकास समितीचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र वराडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

सध्या जिल्ह्यात तापमानाचा पारा सातत्याने वाढत असून नागरिकांना चक्कर येणे, डिहायड्रेशन, रक्तदाब कमी होणे यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. विशेषतः बसस्थानके, रेल्वे स्टेशन, मुख्य बाजारपेठा तसेच चौकांमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांची वर्दळ असते. अशा ठिकाणी तातडीची मदत उपलब्ध व्हावी यासाठी उष्माघात कक्ष उभारणे अत्यावश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

या कक्षांमध्ये थंड पिण्याचे पाणी, ORS व ग्लुकोजची व्यवस्था, प्राथमिक उपचार साहित्य, आरोग्य कर्मचाऱ्यांची नियुक्ती तसेच सावली, बसण्याची व्यवस्था, पंखे किंवा कूलर उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे.

“वाढत्या उष्णतेमुळे संभाव्य जीवितहानी टाळण्यासाठी प्रशासनाने आरोग्य विभागाला तात्काळ सूचना देऊन हे कक्ष सुरू करावेत,” असे आवाहन देवेंद्र वराडे यांनी केले आहे. जनसामान्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने प्रशासनाने या मागणीकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने कार्यवाही करावी, अशी अपेक्षाही समितीच्या वतीने व्यक्त करण्यात आली आहे.

✍️ गुरू शिंदे -8983956862

journalistgurubaba@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!